ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. जर कोणी जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्या लोकांवर कादेशीर कारवाई केली जाईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांना बोलताना स्पष्ट केलं.
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या राजकारण तापलं आहे. प्रशासनाकडून सर्वांना शांततेच आवाहन केलं जात आहे. आम्ही राज्यातील पोलीस महासंचालकांना जिल्ह्यातील पोलिस आयुक्तांसोबत बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. आणि महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची अशांतता होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं.
राज्यात ३ तारीखनंतर काही होईल असं मला वाटत नाही, आम्ही तयार आहोत. कायदा व सुव्यस्था नियंत्रणात राहील याचा आम्ही प्रयत्न करतोय. कुठल्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजामध्ये तेढ, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कुठलीही कृती कारवाईला पात्र ठरते. त्याप्रमाणे संबंधितांवर मग ती व्यक्ती असो की संघटना त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय हे खरं आहे, असं वळसे पाटील म्हणाले.
तसेच अमरावतीत सध्या सुरु असलेल्या तणावाबद्दल बोलताना ते म्हणाले, काही घटक जास्त सक्रिय असल्याने तेथे तणाव निर्माण झाला आहे. त्या घटकांचा बंदोबस्त केला पाहिजे असं ते म्हणाले.