सुमारे २६ मशिदींच्या मौलवींनी घेतला निर्णय
ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज ठाकरेंच्या (raj thackeray) वक्तव्यानंतर महाराष्ट्रात लाऊडस्पीकर वादाला सुरुवात झाली आहे. आता लाऊडस्पीकर वादाच्या (Loudspeaker Row) पार्श्वभूमीवर मुंबईतील मुस्लीम धर्मगुरुंनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील सुमारे २६ मशिदींच्या मौलवी आणि ट्रस्टींची बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, आता लाऊडस्पीकरशिवाय सकाळची अजान देण्यात येमार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुऴे पहाटेची अजान लाऊडस्पीकरशिवाय होणार आहे. सुन्नी बडी मशीद याठिकाणी ही बैठक पार पडली. ज्यामध्ये भायखळ्यातील मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा भागातील मुस्लीम मौलवी, धर्मगुरु आणि मशिदींचे ट्रस्टी एकत्र आले होते.
दरम्यान, राज्यात लाऊडस्पीकरवरून वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे राज्यात काल मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर राज्यात शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी मौलविंनी बैठक घेत लाऊडस्पीकर शिवाय अजान देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मुंबईत २६ मौलवींनी बैठक घेत कोर्टाच्या आदेशानुसार, या भागात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकरवर अजान होणार नाही असा निर्णय घेतला. यानंतर प्रसिद्ध मिनारा मशिदीत लाऊडस्पीकरशिवाय सकाळची अजान देण्यात आली.
भोंग्याविनाच होणार अजान
भायखळ्यातील मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा भागातील मुस्लिम धर्मगुरुंमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दुसरीकडे मुंबईतील झोन ११ चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी मुंबईतील मालाडू मालवणी येथील मशिदींमधून अजान देण्याबाबत मशिदींचे ट्रस्टी आणि मौलानांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मालाड, मालवणीतील जवळपास सर्व मशिदींच्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मुंबई पाठोपाठ राज्याच्या वेगवेगळ्या भागातील मुस्लिम धर्मगुरुंनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सकाळची अजान ही भोंग्याविनाच करण्याचा निर्णय घेतला आहे.