पुणे / प्रतिनिधी :View Post
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यात वाढ झाल्याने महाराष्ट्रात हुडहुडी पसरली असून, जळगावात मंगळवारी सर्वात कमी 5.3 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील राज्यातील थंडीची तीव्र लाट तसेच कोरडय़ा हवामानामुळे राज्यात थंडी वाढली आहे. मंगळवारी अनेक भागात हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भाच्या अनेक भागात हुडहुडी पसरली आहे. धुके तसेच हाडे गोठविणाऱ्या थंडीमुळे पहाटे तसेच सायंकाळपासूनच शेकोटय़ा पेटायल्या लागल्या आहेत. मराठवाडय़ातही थंडीचा प्रभाव अधिक आहे. तेलंगणा, गुजरात तसेच मध्य प्रदेशातील थंडीचा प्रभाव या भागात जाणवत आहे. उत्तरमध्य महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंडी कायम राहणार आहे. पुणे, नाशिक,जळगाव, औरंगाबाद येथे हंगामातील निच्चांकी तापमान नोंदविण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी नोंदविण्यात आलेले राज्याच्या विविध शहरांतील किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये
कुलाबा 20, सांताक्रूझ 17, रत्नागिरी 15.8, डहाणू 16.2, पुणे 7.4, लोहगाव 11.3, कोल्हापूर 14.2, महाबळेश्वर 12.1, नाशिक 7.6, सांगली 12.2, सातारा 10, सोलापूर 13.4, औरंगाबाद 7.7, परभणी 10, नांदेड 10.6, अकोला 10.5, अमरावती 11.3, बुलढाणा 11, ब्रह्मपुरी 11.4, चंद्रपूर 10.8, गोंदिया 8.6, नागपूर 9.2, वाशिम 11.8, वर्धा 10.4, यवतमाळ 9.5, पणजी 17.2.