मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा : विकासकामांना सहकार्य करण्याचे आवाहन
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- एकरकमी पाणी बिल भरणा योजना खुली
- आयआयटीसाठी सरकार नव्या जागेच्या शोधात
- स्पेशल पर्पज व्हेईकलसाठी 17 पदे भरणार
- केरी-पंचायतीला 1300 चौरस मीटर जमीन प्रदान
प्रतिनिधी /पणजी
राज्यात थकीत पाणी बिलाची संख्या मोठी असल्याने ही बिले त्वरित भरली जावीत, यासाठी एकरकमी पाणी बिल भरणा योजना सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी थकीत पाणी बिले लवकरात लवकर भरावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काल बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. तसेच दोनापावला येथील कन्वेक्शन सेंटर उभारणे, गोवा गृहनिर्माण मंडळाकडून 30 कोटी रुपये खर्च करून इमारत घेणे, पर्यटनासाठी स्पेशल पर्पज व्हेईकलसाठी सुमारे 17 पदे भरणे, केरी-पेडणे पंचायतीला 1300 चौरस मीटर जमीन कचरा विल्हेवाटीसाठी हस्तांतरित करणे, लोहखनिज आयात नियमात बदल करणे, असे अन्य महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
दोनापावला येथील कन्वेक्शन सेंटर उभारणीसाठी कंत्राट निश्चित करण्यात आल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, या सेंटरच्या कामासाठी तीन कंत्राटदारांना पीपीपी तत्त्वावर नेमण्यात आले असून, हे सेंटर दोन वर्षांत बांधून पूर्ण होणार आहे. यापैकी न्यू कन्सोलिटेड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड आणि मयूर इंजिनिअरिंग ऑक्टोपॅड कन्सलटन्ट व अन्य एका कंपनीला ह्या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे राज्याला सुमारे 32 टक्के महसूल प्राप्ती होणार आहे. या कन्वेक्शन सेंटरमध्ये 300 खोल्यांचे नियोजन असून ते पूर्णतः अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असेल, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
पर्वरीत 30 कोटी खर्चून घेणार इमारत
पर्वरी येथे गोवा गृहनिर्माण मंडळाकडून सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून इमारत खरेदीसाठी मंत्रिमंडळात मान्यता घेण्यात आली. या इमारतीमुळे सर्वसाधारण प्रशासन विभागाचे काम अधिक सुनियोजित होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
स्पेशल पर्पज व्हेईकलसाठी सुमारे 17 पदे
पर्यटनदृष्टय़ा विकास व्हावा, या दृष्टीने गोवा पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत स्थापन केलेल्या स्पेशल पर्पज व्हेईकलसाठी सुमारे 17 पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळात मंजुरी घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. गोवा हे भारतातील पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाचे राज्य असल्याने राज्याचा विकास हा पर्यटनक्षेत्रावर अधिक अवलंबून असल्याने कोणतीही कमतरता भासू नये किंवा ती भरून यावी, यासाठी 17 पदे स्पेशल पर्पज व्हेईकलसाठी भरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
लोहखनिज आयात नियमांत बदल करणार
राज्याचा सर्वांगीण विकास हेच सरकारचे ध्येय आहे. विकासाची गरज म्हणून इतर राज्यांतून लोहखनिज आयात करण्यासाठी नियम बदलण्यात येणार आहे. या नियम बदलासाठी मंत्रिमंडळात मंजुरी घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
पेडणे तालुक्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले असून, त्यापैकी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व धारगळ आयुष इस्पितळांची उभारणी हे आहेत. या ठिकाणी स्थानिक व परदेशी लोक मोठय़ा संख्येने उपस्थिती लावणार असल्याने त्याची दखल घेत केरी-पेडणे येथे पंचायतीला 1300 चौरस मीटर जमीन कचरा विल्हेवाटीसाठी हस्तांतरित करण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. कचऱयाची समस्या निर्माण होऊ नये, यासाठीही सरकार दक्ष असल्याचे ते म्हणाले.
आयआयटी होणार ; पण नवी जागा कुठली?
केंद्रीय शिक्षण खात्याने पत्र पाठवून हरकत घेतल्याने कोठार्ली-सांगेत संभावित आयआयटी प्रकल्पाला खीळ बसली आहे. आता हा प्रकल्प उभारणीसाठी सरकार नव्या जागेच्या शोधात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नेमके कोणत्या ठिकाणी हा प्रकल्प होणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या नव्या जागेच्या माहितीबाबत मौन बाळगले. आयआयटीसाठी नवीन जागा शोधण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत आयआयटी गोव्यात होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘टॅक्सी ऍप’संदर्भात नाताळनंतर होणार बैठक
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी ‘टॅक्सी ऍप’विषयी आग्रही भूमिका घेतली होती. हे ऍप तयार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळे हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी येईल, असे वाटत होते. परंतु हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेलाही आला नाही. हे ऍप लागू करण्यापूर्वी राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेऊनच तसा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मंत्री गुदिन्हो म्हणाले, टॅक्सी ऍपमध्ये आणखी काही सुधारणा करण्यात येणार असून, टॅक्सी व्यावसायिकांना परिपूर्ण ऍप देण्याचा आमचा विचार आहे. नाताळ सणानंतर 26 किंवा 27 रोजी टॅक्सीवाल्यांची बैठक घेण्यात येईल, असे ते म्हणाले.