4 हजार जनावरांचा मृत्यू : 6 लाख जनावरांना लसीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्ह्यात लम्पी विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. त्यामुळे आतापर्यंत 35,838 जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. रोगावर नियंत्रण आणण्यासाठी रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र लसीकरण झालेल्या जनावरांनादेखील या रोगाची बाधा होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे 3941 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोगावर नियंत्रण आणून रोगाला हद्दपार करण्याचे मोठे आव्हान पशुसंगोपन खात्यासमोर आहे.
जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, गाढव, बैल, घोडा, गाढव, कुत्रा, शेळ्dया-मेंढ्या आदींचा समावेश आहे. यापैकी केवळ गाय आणि बैल या गोवर्गीय जनावरांनाच या रोगाची अधिक लागण होत आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आतापर्यंत 5,93,222 जनावरांना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. तरीदेखील प्रादुर्भाव कायम आहे. दिलासादायक बाब म्हणजे 2988 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. तर सध्या 16,853 बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत.
सुरुवातीच्या काळात केवळ बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्यात लम्पीबाधित जनावरे आढळून आली होती. मात्र आता या रोगाने संपूर्ण जिल्ह्यात हातपाय पसरले आहेत. त्यामुळे रोगावर नियंत्रण मिळविताना पशुसंगोपनाचे हाल होत आहेत. बाधित जनावरांवर वेळेत उपचार करण्यासाठी रॅपिड अॅक्शन पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून बाधित जनावरांना घरोघरी उपचार दिले जात आहेत.
लवकरच रोगावर नियंत्रण येईल
आठवडाभरात बाधित जनावरांची संख्या कमी झाली आहे. सर्व जनावरांपर्यंत प्रतिबंधक लस पोहोचविण्यात आली आहे. लवकरच रोगावर नियंत्रण येईल. रोगमुक्त होणाऱ्या जनावरांची संख्यादेखील वाढत आहे. लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
– डॉ. राजीव कुलेर, सहसंचालक पशुसंगोपन खाते