दिवसात 484 नव्या जनावरांना लागण : 12 जनावरांचा मृत्यू
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हय़ात लम्पीस्कीनच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. बुधवारी दिवसभरात 484 जनावरांनी लम्पीची लागण झाल्याचे निदर्शनास आले. तर 12 जनावरांचा मृत्यू झाला. प्रादूर्भाव वाढत असल्याने पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणावर भर दिला आहे. तसेच प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गोवर्गीय पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव वाढत आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे हातकणंगले व पन्हाळा तालुक्यातील अतिग्रे, कबनुर, रांगोळी, तारदाळ, कोडोली आदी पाच ठिकाणी इपीसेंटर स्थापन केली आहेत. त्याचबरोबर आता वडगांव, कोल्हापूर शहर, हेरवाड, गोगवे येथेही इपीसेंटर सुरु केली आहेत. मंगळवारी केवळ 20 जनावरांमध्ये संसर्ग दिसून आला होता. मात्र बुधवारी तब्बल 484 जनावरांमध्ये लम्पीची लागण दिसून आल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. नव्याने लागण झालेल्या जनावरांमध्ये 395 गाय तर 89 बैलांचा समावेश आहे. तर 7 गाय आणि 5 बैल अशा 12 जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये अतिग्रे, तारदाळ, कोडोली येथील प्रत्येकी दोन, कबनूर पाच आणि हातकणंगले येथील एका जनावराचा समावेश आहे.