बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून मराठी भाषिकांना केले होते लक्ष्य
प्रतिनिधी/ बेळगाव
पिरनवाडी येथे कन्नड संघटनांनी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ाची उभारणी केली. यावेळी या परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्या 11 जणांना तब्बल दोन वर्षांनंतर वॉरंट बजावण्यात आले. या सर्वांनी न्यायालयात उपस्थित राहून जामीन मंजूर करून घेतला आहे.
पिरनवाडी येथे संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभे करण्यात आला. त्यानंतर 27 ऑगस्ट 2020 रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे एएसआय पी. एल. तळवार यांनी अनोळखींवर फिर्याद दिली. त्यानंतर या सर्वांवर भा.दं.वि. 143, 147, 148, 341, 336 सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र दोन वर्षांनंतर आता 11 मराठी भाषिक तरुणांना अटक वॉरंट बजावण्यात आले.
मराठी भाषिकांना त्रास देण्यास सुरुवात करण्यात आली असून यापूर्वी गुन्हे अज्ञातांविरोधात नोंदवून आता त्यांना वॉरंट बजावण्याचा प्रताप बेळगाव ग्रामीण पोलिसांनी केला आहे. हे सर्व तरुण बुधवारी जेएमएफसी द्वितीय न्यायालयात हजर झाले. म. ए. समिती आणि शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांना न्यायालयाने विविध अटींवर जामीन मंजूर केला आहे.
नारायण पिराजी मुचंडीकर, रामनाथ मुचंडीकर, चांगदेव मुचंडीकर, संतोष मुचंडीकर, राजू मुचंडीकर, महेश मुचंडीकर, किसन मुचंडीकर, मारुती राऊत, शिवसेना उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, विजयानंद नेसरकर, यल्लाप्पा शिंदे अशी जामीन मिळालेल्या तरुणांची नावे आहेत. या सर्वांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. रिचमॅन रिकी, ऍड. बाळासाहेब कागणकर हे काम पाहत आहेत.