वार्ताहर /जांबोटी
गेल्या 66 वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा लढा आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून आपण सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन आगामी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी व मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीकडे इच्छुकांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करावेत, या संदर्भात जनजागृती करण्यासाठी मंगळवारी जांबोटी येथे जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समितीचे सर्व पदाधिकारी व समितीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते. यावेळी जांबोटी बसस्थानक तसेच बाजारपेठेत फिरून नागरिकांना जागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुक्मयात म. ए. समितीचा भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे तसेच 10 फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांनी म. ए. समितीकडे उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सोमवारी खानापूर शहरात जागृती दौरा करून पत्रके वाटण्यात आली. बुधवारी नंदगड व लोंढा या जिल्हा पंचायत क्षेत्रात जागृती दौरा करण्यात येणार आहे. चारही जिल्हा पंचायत क्षेत्रातील उपाध्यक्षानी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन ग्रामीण भागात जागृती दौरा करावयाचा आहे. यासाठी तसे नियोजनही करण्यात आले आहे.