पंतप्रधान नरेंद्र मोदी-गृहमंत्री अमित शाह यांना पाठविणार पत्र
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सीमा समन्वयक मंत्री बेळगावला येणार होते. परंतु कर्नाटक सरकारने सुरुवातीपासूनच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे घटनात्मक अधिकारांची पायमल्ली होणार आहे. यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पत्र दिल्लीला पाठविण्यासाठी म. ए. समितीचे शिष्टमंडळ मंगळवार दि. 6 रोजी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी 3.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई मंगळवार दि. 6 रोजी बेळगावला येणार होते. परंतु दौरा जाहीर झाल्यापासूनच कन्नड संघटनांचा विरोध होता.त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवत सीमा समन्वय मंत्र्यांना बेळगावमध्ये पाठविण्याची ही योग्य वेळ नाही, असे सांगितले होते. तरीदेखील मंत्री आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे येणाऱ्या मंत्र्यांवर दबाव घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही घटनात्मक अधिकारांची पायमल्ली असून यासंदर्भात म. ए. समिती जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.