प्रतिनिधी /बेळगाव
अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी संपूर्ण जगालाच आदर्श आहेत. सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळाल्याची उदाहरणे नाहीत. मात्र, गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने शत्रूंचा पराभव करता येतो, हे दाखवून दिले आहे, असे खासदार मंगला अंगडी यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, माहिती व सार्वजनिक संपर्क खाते यांच्या संयुक्त विद्यमाने टिळकवाडी येथील वीरसौध येथे आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याचवेळी माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री हे महान देशभक्त होते, असे सांगत खासदारांनी त्यांचाही गौरव केला.
यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, मनपा आयुक्त रुदेश घाळी, उपायुक्त भाग्यश्री हुग्गी आदींचा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदी अधिकारी उपस्थित होते. सर्वमंगला अरळीमट्टी यांनी सूत्रसंचालन केले.