एकही पथदीप नाही : कामगारांना अंधारातच करावा लागतोय प्रवास : हेस्कॉम अधिकारी-नगरपंचायत पदाधिकाऱयांचे दुर्लक्ष
आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
मच्छे औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या तीस वर्षांपासून एकही पथदीप सुरू नाही. वसाहतीमध्ये कामाला येणाऱया कामगारांना मात्र अंधारातच आपल्या कारखान्याकडे ये-जा करावी लागत आहे. हेस्कॉम व मच्छे नगरपंचायतीचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी कामगारवर्गातून होत आहेत. सध्या तरी ही औद्योगिक वसाहत पथदीपांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटक राज्यात औद्योगिक उत्पादन आणि उत्पन्न यामध्ये बेंगळूरचा पहिला क्रमांक लागतो, त्यानंतर बेळगाव दुसऱया स्थानावर आहे. बेळगावात फार पूर्वीपासून उद्यमबाग औद्योगिक वसाहत आहे. त्यानंतर मच्छे औद्योगिक वसाहत व काकती-होनगा या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. यामुळे हजारोंना बेळगावमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात बेळगावचे नाव सातासमुद्रापारही पोहोचले आहे.
अलीकडे मच्छे परिसरात विविध प्रकारच्या कारखान्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली ही जमेची बाजू आहे. याचा स्थानिक लोकांना फायदा होत असून अगदी पुरुषांबरोबरच महिलांनाही रोजगाराचे साधन या कारखान्यांमुळे मिळत आहे.
उद्योजकांच्या जिद्द-कृतीला सलाम
उद्यमबाग परिसरात अपुऱया पडणाऱया जागेचा विचार करून अनेक उद्योजकांनी मच्छे भागात कारखान्यांची उभारणी केली. शहरापासून दूर येऊन उद्योग-व्यवसाय उभारण्याचे धाडस त्यांनी दाखविले. यामुळे या भागातील सर्व उद्योजकांच्या जिद्दीला आणि कृतीला सलाम करावाच लागेल. कारण त्यांनी मच्छेसारख्या भागात उद्योगधंदे
उभारले.
त्यामुळे परिसरातील अनेक खेडेगावांतील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला. हजारो जणांचा उदरनिर्वाह मच्छे औद्योगिक वसाहतीवर अवलंबून आहे.
बेरोजगार हातांना कामे मिळाली असून कारखान्यांकडून विविध प्रकारच्या सोयीसुविधाही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतीबरोबरच येथील सर्वसामान्य जनतेला-कामगारांना जगण्यासाठी एक नवी ऊर्जा, दिशा मिळाली आहे, यात शंका नाही. मात्र, मच्छे औद्योगिक वसाहतीतील कोणत्याही रस्त्याच्या बाजूला एकही पथदीप दिसत नाही. रात्रीच्या वेळी केवळ अंधारच अंधार पसरलेला दिसून येतो. याकडे लक्ष देणार कोण? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी तरी…
मच्छेतील कारखान्यांमध्ये परिसरातील महिलाही मोठय़ा संख्येने कामाला येतात. बहुतांशी महिला कामगार चालतच येतात. त्यांना रात्रीच्या वेळी अंधारातूनच जावे लागत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी पथदीप बसविण्याची गरज आहे.
गांभीर्याने विचार करण्याची बाब
मच्छे औद्योगिक वसाहतीमध्ये विद्युत खांब आहेत. मात्र, पथदीप कुठेच बसविण्यात आलेला नाही. याचे नेमके कारण काय आहे, हेच आम्हाला कळत नाही. कारखान्यांमधून सरकारला भरपूर कर दिला जातोय, मग या भागात सुविधा पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? सध्याच्या आधुनिक युगात मच्छे वसाहतीमध्ये पथदीप नाहीत, ही गांभीर्याने विचार करण्याची बाब आहे.
– रामलिंग सुतार
सर्वसामान्य कामगारांची गैरसोय
मच्छे औद्योगिक वसाहतीमध्ये सेक्मयुरिटी म्हणून काम करतो. मी रोज सायकलवरूनच कामाच्या ठिकाणी कारखान्याला ये-जा करतो. रात्री येथील रस्त्यांवर सर्वत्र अंधारच असतो. यामुळे सायकलवरून ये-जा करणे मुश्कील झाले आहे. सर्वसामान्य कामगारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या भागात ठिकठिकाणी पथदीप बसविण्याची आवश्यकता आहे. याकडे हेस्कॉमने लक्ष देणे गरजेचे आहे.
– पुंडलिक मेदार
कामगारांच्या हिताचा विचार व्हावा
ज्या कामगारांकडे दुचाकी व इतर वाहने आहेत, ते कामगार आपापल्या कामाच्या ठिकाणी येऊ शकतात. मात्र, सायकल, बस-टेम्पोने येणाऱया कामगारांची गैरसोय मात्र अधिक होत आहे. कारण त्यांना मच्छे बसस्टॉप किंवा जांबोटी रोड बसस्थानक या ठिकाणाहून मच्छेतील कारखान्यांकडे अंधारातून चालतच यावे लागते. या कामगारांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने कामगारांच्या हिताचा विचार करायला हवा.
-रामलिंग बेळगावकर