गुन्हय़ातील बंदूक जप्त; विधिमंडळात उमटले पडसाद; कोरडेवाडीत मृतांवर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ नवारस्ता
पाटण तालुक्यातील मोरणा विभागात कोरडेवाडी येथे झालेल्या पूर्ववैमनस्यातून मदन कदम याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात धावडे-कोरडेवाडी येथील श्रीरंग लक्ष्मण जाधव (वय 48) व सतीश बाळू सावंत (वय 35) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश लक्ष्मण जाधव (वय 44) हे गंभीर जखमी झाले. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी मदन कदमसह त्याची पत्नी व दोन मुले अशा चौघा कुटुंबीयांना बंदुकीसह ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यासह संपूर्ण जिह्यात खळबळ माजली आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले असून विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या घटनेने मोरणा विभागासह पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
या घटनेची पाटण पोलिसांत नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद या घटनेत गंभीर जखमी प्रकाश लक्ष्मण जाधव यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या व दाखल फिर्यादीनुसार, संशयित आरोपी मदन नारायण कदम (वय 50), पत्नी सौ. नीता मदन कदम (वय 45), मुलगा गौरव मदन कदम (वय 22), योगेश मदन कदम (वय 25, सर्व रा. शिद्रुकवाडी, ता. पाटण) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण
तक्रारीत म्हटले आहे, की पाच दिवसांपूर्वी मोरणा-गुरेघर रस्त्यावर कोरडेवाडी गावच्या हद्दीत गाडीची धूळ अंगावर उडाली म्हणून फिर्यादी प्रकाश जाधव यांचे चुलत भाऊ सखाराम जाधव यांना मदन कदम व मुले योगेश, गौरव कदम यांनी मारहाण केली होती. यावेळी भांडणात मदन कदम यांनी याच गावातील मात्र मुंबईवासिय श्रीरंग लक्ष्मण जाधव यांनाही शिवीगाळ केली होती. याबाबत कोणी विचारणा करायला आले तर गोळ्या घालीन, अशी धमकीही दिली होती. सखाराम जाधव यांनी याबाबतची माहिती प्रकाश व श्रीरंग जाधव यांना दिली होती व या संदर्भात पाटण पोलिसात तक्रारदेखील दाखल केली होती.
रविवारी जाब विचारायला गेल्यानंतर गोळीबार
रविवार 19 मार्च रोजी कोरडेवाडी, धावडे गावासह स्थानिक विकास सोसायटीची निवडणूक कोकिसरे येथे होती. तेथे स्वतः प्रकाश व मोठे भाऊ श्रीरंग लक्ष्मण जाधव असे दोघे ठाण्याहून कोकिसऱयाला मतदानाला आले होते. मतदान करून ते संध्याकाळी घरी आल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरंग लक्ष्मण जाधव, सतीश बाळू सावंत, प्रकाश लक्ष्मण जाधव व अन्य पाच-सहा जणांनी मिळून पाच दिवसांपूर्वी मदन कदम याने सखाराम जाधव यांना मारहाण व श्रीरंग जाधव यांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी ही सर्व मंडळी शिद्रुकवाडी येथील मदन कदम याच्या घरी गेली. त्यावेळी मदन कदम याचा मुलगा योगेश, गौरव व पत्नी नीता घरीच होते. मदन कदम यास घराबाहेर बोलावून ‘तुम्ही मारहाण, शिवीगाळ का केली?’ असा जाब विचारला. त्यानंतर आपसात शाब्दिक चकमकही झाली व जाधव मंडळी मदन कदम याच्या घरातून बाहेर पडली. त्याचवेळी मागच्या बाजूने मदन कदम यांची मुले शिव्या देत होती. तर मदन कदम जोरजोरात ‘घरातून बंदूक आणून द्या, यांना गोळ्या घालणार’ असे ओरडत होते. तीच भाषा मुलांचीही होती.
जाधव मंडळी रस्त्यावरून जात असताना मदन कदम याच्या पत्नीने घरातील बंदूक मदन कदम याच्या हाती हातात आणून दिल्यानंतर मदनची दोन्ही मुले रस्त्यावर धावत आली. बारा बोर बंदुकीने मदन कदम याने पहिली गोळी श्रीरंग लक्ष्मण जाधव यांच्यावर झाडली तसे ते खाली पडले. त्यानंतर दुसरी गोळी फिर्यादी प्रकाश जाधव यांच्यावर झाडण्यासाठी बंदूक रोखली. मात्र त्याचवेळी जाधव यांनी चलाखीने मदन कदम याचा मुलगा योगेश याला माझ्यासमोर धरल्याने मदन कदम यांनी गोळी मारली नाही. माझ्या बाजूस असलेल्या सतीश बाळू सावंत यांच्यावर मदन कदम याने दुसरी गोळी झाडली. त्यात तो खाली पडला. त्यानंतर आणखी दोन गोळ्या मदन कदम याने झाडल्या. त्यानंतर मदन व त्याच्या मुलांनी प्रकाश जाधव यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत बंदुकीच्या मागच्या भागाने हातावर फटके दिले. त्यात माझा डावा हात प्रॅक्चर झाला. जाधव यांना जबरदस्त मारहाण झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना उपचारार्थ कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यामध्ये झालेल्या गोळीबारात श्रीरंग जाधव व सतीश सावंत यांचा मृत्यू झाला असून प्रकाश जाधव गंभीर मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या गोळीबाराची नोंद पाटण पोलिसांत झाली असून पोलिसांनी मदन कदम याच्यासह त्याची पत्नी सौ. नीता, मुले योगेश व गौरव या चौघांसह बारा बोरची बंदूक ताब्यात घेतली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षकांची भेट
दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक विकास पाडळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती पाटील, मल्हारपेठचे सहाय्यक निरीक्षक उत्तम भापकर यांनी पथकासह भेट दिली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड करत आहेत.
पोलिसांची शिताफीने झडप…
गोळीबारानंतर संशयित आरोपी मदन कदम हा आपल्या फार्महाऊसमध्ये बंदूक घेऊन तसाच उभा होता. शिवाय दोन्ही मृतदेह तसेच घटनास्थळी पडून होते. ‘कोणी पुढे याल, तर तुमच्यावरही गोळ्या झाडीन’ असे म्हणून दहशत माजविण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे जीवाच्या भीतीने आसपास असलेले नागरिक पुढे जात नव्हते. मात्र घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला हातातील बंदूक खाली टाकण्याचे आवाहन केले. मात्र त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक विकास पाडळे, उपनिरीक्षक महेश पाटील, कर्मचारी अतुल लोंढे, उमेश मोरे, आबासाहेब गलांडे, मुकेश मोरे, वैभव पुजारी, नागनाथ भरते, संतोष कुचेकर यांनी मोठय़ा शिताफीने त्याच्यावर झडप घालून त्याच्याकडील बंदूक ताब्यात घेतली.
कोरडेवाडी सुन्न…
या गोळीबारात मृत्यू झालेल्या श्रीरंग जाधव व सतीश सावंत यांच्या मृतदेहाचे ऑन कॅमेरा शवविच्छेदन कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. मृतदेह कोरडेवाडी येथे आणल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. आरोपींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, असा टाहो नातेवाईकांकडून फोडला जात होता. मृत सतीश सावंत यांना दोन लहान मुले असून एक अंगणवाडीत तर दुसरा इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे. वडिलांचे छत्र हरपल्याने दोन्ही मुले पोरकी झाली असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. दोन दिवस कोरडेवाडीतील वातावरण मन सुन्न करणारे होते.