भाजीचे पिक धोक्यात : शेतकऱयांचे कष्ट पाण्यात
प्रतिनिधी /फोंडा
मडकई येथील बार आम्रेखाजन या खाजनशेतीच्या बंधाऱयाला भगदाड पडल्याने शेतकऱयांनी मोठय़ा कष्टाने लावलेले भाजीचे पिक व अन्य शेती धोक्यात आली आहे. मडकई गावातील आम्रेखाजन ही सर्वात मोठी शेती असून अनेक शेतकरी कुटुंबाचा त्यावर उदरनिर्वाह चालतो. सध्या या शेतीत मिरची, मुळा, तांबडीभाजी व इतर भाजीची लागवड केल्याची माहिती शेतकऱयांनी दिली.
पंधरा दिवसांपूर्वी बंधाऱयाला भगदाड पडल्याने जुवारी नदीचे खारे पाणी शेतीत घुसले आहे. शेतकरी समितीच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱयांनी केला आहे. महिन्याभरापूर्वी फोंडा तालुक्याच्या मामलेदारांकडे शेतीच्या देखरेखीसंबंधी तक्रार करण्यात आली होती. मात्र त्याकडे कुणीच गांभीर्याने लक्ष न घातल्याने पिक धोक्यात आल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रेमानंद गावडे व स्थानिक शेतकऱयानी दिलेल्या माहितीनुसार या पारंपरिक शेतीत हंगामात भात व अन्यवेळी गावातील शेतकरी कुटुंबे भाजीपाला लावतात. मात्र बंधाऱयाची देखरेख व शेतकऱयांच्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने कष्ट वाया जात आहेत. सध्या खाजन शेतीत लावलेली मिरचीची रोपे व इतर भाज्यांची रोपे खाऱया पाण्यामुळे धोक्यात आली आहेत. एकाबाजूने सरकार शेतीकडे वळण्याचे आवाहन करते तर दुसरीकडे कष्ट करणाऱया शेतकऱयांकडे दुर्लक्ष करते. कृषीमंत्री व इतर संबंधीतांनी आम्रेखाजन शेतीशी संबंधीत समस्यांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.