लढय़ात सर्वसामान्यांना सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर हे गगनाला भिडले आहेत. पेट्रोल,डिझेल, गॅस यांचे दर हे ऐतिहासिक रित्या वाढले आहेत. बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसह असंघटित कामगार, बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत. महागाईमुळे जगणे अशक्यप्राय झाले आहे. या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शहरासह जिल्हय़ातील सर्व संघटना, छोटे समूह, सामान्य जनतेने एकत्र येऊन लढायचा निर्धार केला आहे. ऐतिहासिक बिंदू चौकातून शुक्रवार (दि. 29) रोजी सकाळी 10 ते 12 असे महाधरणे आंदोलनामधून महागाई विरोधात रणशिंग फुंकण्यात येणार आहे. या आंदोलनास टोल आंदोलन प्रमाणे आपले गट-तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन महागाईविरोधी नागरी कृती समितीने केले आहे.
या समितीचे पदाधिकारी माजी आमदार संपत बापू पवार-पाटील, गिरीश फोंडे, उमेश पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोरोना काळामध्ये लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले. कोटय़वधी लोकांना आपला रोजगार गमवावा लागला. दुःखाचा डोंगर कोसळला. अशा संकटातच सरकारने जनतेच्या जखमेवर फुकर घालण्याऐवजी मीठ चोळत महागाई प्रचंड वाढवली आहे. सत्तेतील नेते हे निवडणुका जवळ आल्यानंतर ऍक्शन मोडमध्ये असतात मात्र जनतेच्या प्रश्नावर उदासीन असतात. जनतेचा असंतोष महागाई विरोधात एकवटता कामा नये, याकरिता भावनिक व अस्मितेचे मुद्दे उपस्थित करत प्रसारमाध्यमांव्दारे जनतेचे लक्ष महागाई बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य या मुख्य मुद्दय़ांऐवजी इतरत्र वळवतात. सरकारच्या या धोरणाविरोधात लढण्यासाठी या महाधरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.
1965 ची पुनरूक्ती करणार
1965 मध्ये कोल्हापुरात महागाई विरोधात ऐतिहासिक लढा उभारण्यात आला होता. सर्वसामान्य कोल्हापूरकर रस्त्यावर उतरला होता. सरकारविरोधात रोष व्यक्त केला होता. त्या ऐतिहासिक लढय़ाप्रमाणेच सध्या वाढत असलेल्या महागाईविरोधात कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन कृती समितीने केले आहे.