ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशातील दुसरा आणि महाराष्ट्रातील पहिला असा ३०३ फुटांचा तिरंगा आज कोल्हापुरात पुन्हा फडकला. कोल्हापूर पोलीस आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. गेल्या तीन वर्षापासून हा तिरंगा फडकला नव्हता. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र तिरंगा फडकवला जाणार आहे. त्यानिमित्ताने आज हा तिरंगा फडकला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत माने यांची उपस्थिती होती.
यावेळी, खासदार धंनजय महाडिक, आमदार पी.एन.पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, उपस्थित होते. त्याचबरोबर रज्यानियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विरोधक मोदींवर टीका करत आहेत. पण देशातील प्रत्येक कार्यक्रमात देशवासीयांचा सहभाग असावा असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी हर घर तिरंगा ही संकल्पना राबविली आहे. तसेच नव्या पिढीसमोर स्वातंत्र्याचा इतिहास समोर येण्यासाठी केलेलं हा प्रयत्न आहे. असे पाटील म्हणाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जात आहे. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे देशात देशात २५ कोटी कुटुंब घरावर तिरंगा लावणार आहेत, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, विरोधक पंतप्रधान मोदींवर टीका करत आहे. त्यांची अपेक्षा आहे मोदी जातील आणि आम्ही येऊ पण मोदींचे ध्येय मोठे आहे, राष्ट्रप्रेम रुजावे हीच यामागची भावना आहे. तसेच रात्रभर मेहनत करून कोल्हापूर पोलीस आणि यंत्रणांनी हा ध्वज उभारल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.
जिल्ह्यातील पर्यटन वाढावं यासाठी विरोधकांनी हातात हात घालून काम करावे.विकासाचा जिथर मुद्दा येईल त्याठिकाणी आपण सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजकारण आणि विकासासाठी विरोधकांनीही एकत्र येऊन काम करावे असे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.