जर्मन कवी गटे शाकुंतल बाबत म्हणतो की, ‘जर तुम्ही यौवनातले फुल, प्रौढावस्थेतलं फळ आणि अन्य काही सामुग्री एकाच ठिकाणी शोधू इच्छित असाल, जेणेकरून तुमच्या आत्म्याला एकाच वेळी तृप्ती आणि शांती मिळेल, तसेच एकाच स्थळी तुम्ही स्वर्ग आणि मर्त्य लोक पाहू इच्छित असाल, तर माझ्या तोंडून एकच नाव येईल, ते म्हणजे महाकवी कालिदासाचे ‘शाकुंतल’ ….कालिदासाची अमर रचना !’
‘काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुंतला। तत्रापि च चतुर्थोएङ्कस्तत्र श्लोकचतुष्टयम्।।’
म्हणजेच सर्व काव्यप्रकारांमध्ये नाटक सुंदर आहे. त्यातही सर्वात सुंदर शाकुंतल आहे. त्या शाकुंतलातही चौथा अंक आणि त्यातही चार श्लोक अतिशय सुंदर आहेत.
‘अभिज्ञान शाकुंतलम्’ मध्ये कालिदासाचे सरस काव्यगुण दिसतात. त्यातही विशेषत्वाने श्रुंगार हा मुख्य रस आहे. त्याचप्रमाणे हास्य, वीर, करूण रसाची अभिव्यक्तीही छान झाली आहे. संपूर्ण नाटकात कालिदास ज्यासाठी ओळखला जातो, त्या उपमा, उत्प्रेक्षा अत्यंत संयुक्तिक आणि नाटकाची उंची वाढवण्यासाठी पोषक ठरल्या आहेत. याशिवाय शब्दांचा चपखल वापर, भावाला अनुरूप अशा छंदाची निवड, व्यंजना-शक्तीचा उपयोग करून त्याने आपली शैली रमणीय केली आहे.
जिथे कालिदास शकुंतलेच्या सौंदर्याचे वर्णन करतो, तिथे केवळ उपमा, उत्प्रेक्षा वापरून थांबलेला नाही, तर सुरूवातीला तो फक्त एवढेच सांगतो की, ‘तपोवनातील रहिवासी इतके रूपसुंदर आहेत, की त्यापुढे वनातील लतांनी उद्यानातील लतांनाही फिके पाडले आहे!’ दुष्यंत शकुंतलेबाबत म्हणतो की, ‘इतक्मया सुंदर मुलीला आश्रमातील नियम पाळायला सांगणे म्हणजे नीलकमलाच्या पाकळीने बाभळीचे झाड कापण्यासारखे आहे.’ अशी कितीतरी सुंदर वाक्मये चपखल उपमा, उत्प्रेक्षांसह जागोजागी विखुरली आहेत. राजा शकुंतलेच्या सुकुमार देहाबद्दल बोलताना तिची तुलना फुलांनी बहरलेल्या हिरव्यागार वेलीशी करतो. त्यामुळे तिचे विलक्षण सौंदर्य वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या डोळय़ासमोर उभे राहते. मग त्या सौंदर्याला चरमसीमेवर पोहोचवण्यासाठी कालिदास तिथे भुंग्याला आणतो, तो तिच्या चेहऱयाभोवती फुल समजून रुंजी घालून शकुंतलेला सतावतो. जणू तो त्या फुलातला मध चाखण्यासाठी उत्सुक झाला आहे. अशा प्रकारे केवळ अलंकारांचा वापर न करता त्याने व्यंजनेचाही प्रभावी वापर केला आहे. हीच व्यंजना म्हणजे त्याच्या काव्याची खरी शक्ती आहे. कालिदासाला महाकवी का म्हटले जाते, ते हे नाटक वाचल्यावर लक्षात येते. ते किती सार्थ आहे हेही आपल्याला पटते. अशा ह्या कालिदासाने संस्कृत काव्याला संपूर्ण जगातील काव्यजगतात जो मान मिळवून दिलाय, त्यामुळे भारतीय माणसाची मानही अभिमानाने नक्कीच ताठ झाली आहे!