ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोल लागले आहे. या सोहळ्यादम्यान जवळपास 600 श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. त्यामधील 11 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर मोठय़ा दिमाखात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून लाखो श्री सदस्य आले होते. सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत हे श्री सदस्य भर उन्हात बसले होते. कार्यक्रमानंतर जवळपास 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ महिलांचा समावेश आहे.
उष्माघाताचा त्रास झालेले लोक नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. हृदयविकाराच्या समस्या आणि रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतार यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी काही रुग्ण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस केली. तसेच राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.