ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं राज्यातील जनतेला गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा करता आला नव्हता, परंतु आता कोरोना महामारी संपल्यानं यावर्षी नियममुक्त आणिनिर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करता येणार आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाचे आगमन झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोना संकटामुळं मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं येऊ देत, त्यांची तमा करायची नाही, अशी हिंमत बाळगुया. लाडक्या गणरायाचं स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडं घालतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लाडक्या गणरायाचं उत्सव करताना महाराष्ट्रच्या विकासाचा पुनश्च श्री गणेश करण्याचा आपण संकल्प करूया. उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणे देखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण या विषयांवर सार्वजनीक मंडळांनी भर देऊन जनजागृती करण्याचं आवाहन देखील एकनाथ यांनी यावेळी केलं आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं आगमन आता घराघरात होत आहे. त्याच्या कृपेनं गेल्या दोन वर्षांपासून कायम असलेलं कोरोनाचं संकट आता दूर झालंय. त्यामुळं यावर्षी आपण उत्साहानं आणि जल्लोषात तसेच निर्बंधमुक्त आणि नियममुक्त वातावरणात गणरायाचं स्वागत करत आहोत. गणेशाचं हे आगमन राज्यातील जनेतच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना करत महाराष्ट्रातील विकासाचा संकल्प पूर्णत्वास जाऊ दे, असं साकडं गणरायाला घातलं आहे