प्रतिनिधी/ बेंगळूर
सीमाप्रश्नाच्या मुद्दय़ावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रासह सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, बोम्माई यांनी महाराष्ट्र सरकारने दोन्ही राज्यांमध्ये शांतता राखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
शुक्रवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, न्याय आपल्या बाजूने आहे. दोन्ही राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलावीत. भारत सांघिक राज्य आहे. प्रत्येक राज्याला त्यांचे स्वतःचे अधिकार आहेत. कायदा-सुव्यवस्था राखणे संबंधित राज्यांचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र सरकारने राज्याराज्यांमधील अंतर कमी करावे, असेही ते म्हणाले.