मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर केला आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता यंदा १२ वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आला आहे.
यंदा राज्याचा बारावीचा सरासरी निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. मात्र, विभागनिहाय आकडेवारीचा विचार करता राज्यात कोकण विभागानं पुन्हा बाजी मारली असून औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा एकूण निकाल ९९. ६३ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा निकाल यंदा ९९.४५ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. याशिवाय उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९८. ८० टक्के लागल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २. ५२ टक्क्यांनी वाढला आहे.
बारावीत यावर्षी ७०७५१८ विद्यार्थी तर ६०७४४७ विद्यार्थीनी उतीर्ण झाल्या आहे. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.७४ टक्के आहे तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.५४ टक्के आहे. त्यामुळे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.