पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत देशात मोठय़ा प्रमाणात सकारात्मक बदल होत आहेत. मात्र, देशाचा विचार करता गेल्या दोन-तीन वर्षात महाराष्ट्र सरकार आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स यात मागे पडला आहे. या क्षेत्रात तामिळनाडू, कर्नाटक या राज्याने आघाडी घेतल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान कौशल्य आणि उस्त्रोजक विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत चंद्रशेखर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देश प्रगतीपथावर जात आहे. इंटरनेट वापर सुरक्षिततेच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञाान कायदा प्रस्तावित असून, त्यावर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले. त्याचीच प्रचिती म्हणून सध्या देशात 75 हजार स्टार्टअप सुरू आहेत. प्रत्येक महाविद्यालयात दहा-पंधरा स्टार्टअप आहेत. सध्या डिजीटल तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ‘डिजीटल स्कील्स’ ही योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.
केंद्र सरकारने कौशल्य विकासासाठी योजना सुरू केल्या आहेत. मात्र, या योजना प्रभावीपणे राबविण्यात राज्य सरकारला रस नाही. देशातील भ्रष्टाचार संपावा, यासाठी प्रधानमंत्री किसान योजना, डीबीटी, यूपीआय, आयुष्यमान भारतसारख्या अनेक योजनांची घोषणा गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारने केली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 2026 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरची, तर 2030 पर्यंत 10 ट्रिलियन डॉलरची होणार आहे. भारत जागतिक पातळीवर प्रगत देश म्हणून ओळखला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.