मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्री ८.३०वाजता संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीकेंड लॉकडाऊन केल्यानं प्रथमच राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संबोधित करणार असल्याबद्दल सीएमओच्या अधिकृत ट्विट हॅण्डलरवरून माहिती देण्यात आलेली आहे. या अगोदर वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनबाबत इशारा दिलेला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत तसेच रविवारी टास्कफोर्स सोबत बैठक घेतली होती. त्याबैठकीत राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा देखील झाली. राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याबाबत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं मत तज्ञांनी मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम यांनी आज माध्यमांना सांगितलं होतं.