ऑनलाईन टीम/तरुण भारत
बाळासाहेब (balasaheb thackeray), पवार साहेब(sharad pawar), महाजन(pramod mahajan) ही सगळी मंडळी राजकारणात अग्रेसर होती. त्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. राजकीय व्यासपीठावरून टोकाची टीका, आरोप- प्रत्यारोप केले जायचे. मात्र पातळी सोडून कुणी खाली गेले नाही. मैत्री विसरले नाहीत. खोट्या केसेस, गुन्हे दाखल करणे कधीच झाले नाही असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी केंद्र सरकारला लगावला. बाळासाहेब असते तर शिवसेनेने ज्यांच्याशी संघर्ष केला त्या काँग्रेससोबत केलेली युती पाहून त्यांचे मन व्यतीत झाले असते असा टोमणा भाजपाने लगावला होता. याला पर्यावरण मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, बाळासाहेब आणि पवार साहेबांची मैत्री ही वर्षानुवर्षे होती. आज महाविकास आघाडीचे सरकार झाले आहे. एक युती-मैत्री झालीय ती बघायला मोठे साहेब (बाळासाहेब) असायला हवे होते. त्यांना ही युती पाहून आनंद झाला असता असेही ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी जपलेल्या जुन्या नात्यांच्या आठवणी सांगितल्या.