ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांना आता केंद्र सरकारने सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांना सुरक्षा पुरवली आहे. आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांपैकी काहींच्या कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आता या बंडखोर आमदारांपैकी जवळपास १५ आमदारांना केंद्र सरकराने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरीनंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून शिंदे गटातील आमदारांची कार्यालये फोडण्यात आली आहेत. तसेच आमदारांच्या घराबाहेर सुद्धा निदर्शने करण्यात येत आहे. यामुळे आमदारांनी सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय गृह सचिवांकडे पत्रव्यवहार केला होता. यानंतर केंद्राकडून आमदारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची टीम आमदारांच्या घराबाहेर पाठवण्यात आल्या आहेत.
यामध्ये एकूण १५ आमदारांच्या घराबाहेर सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे समजते आहे. या आमदारांच्या घराबाहेर राज्यातील पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. दरम्यान घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था हटवली असल्याचा दावा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीसुद्धा केला होता. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांची सुरक्षा काढून घेतली नाही असे सांगितले आहे. तसेच आमदारांना सुरक्षा पुरवण्यात येते त्यांच्या कुटुंबियांना नाही असेही सांगण्यात आले होते. यानंतर आमदारांच्या घराबाहेर आता केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
घराबाहेर बॅरिकेट्स
शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आल्यामुळे बंडखोरीमागे भाजपचा हात असल्याचा संशय अधिक बळावला आहे. आमदारांना केंद्राने सुरक्षा पुरवल्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांवर अविश्वास दाखवण्यात आला आहे.