पुणे : जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीच्या 101 टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे (Ramchandra Sabale) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत वर्तविला.
डॉ. साबळे म्हणाले, महराष्ट्रात सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित आहे. यावर्षी वाऱ्याचा वेग कमी आढळ्याने जून महिन्यात पावसात खंड राहण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ापासून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहणार आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत पश्चिम विदर्भ विभागातील अकोला येथे 100 टक्के पाऊस असणार आहे. मध्य विदर्भ विभागातील नागपूर 100 टक्के, यवतमाळ 102 टक्के पाऊसाचा अंदाज आहे. पूर्व विदभातील शिंदेवाही (चंद्रपूर) येथे 103 टक्के पाऊस होईल. मराठवाडा विभागातील परभणी, जालनाला 100 टक्के, कोकण विभागातील दापोलीला 100 टक्के, उत्तर महाराष्ट्रातील निफाड 100 टक्के, धुळे 102 टक्के, जळगाव 100 टक्के, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर 102 टक्के, तर कोल्हापूर, कराड, पाडेगाव, राहुरी, पुणे मिळून 100.3 टक्के पाऊस होईल, असेही डॉ. साबळे यांनी यावेळी नमूद केले.