ऑनलाईन टीम/तरुण भारत
मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदेंच्या बंडांनंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी एकनाथ शिंदेंसोबत बोलणं सुरु असून ते लवकरच परततील असं म्हंटल होतं. आता संजय राऊत यांनी ट्विट करत, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीची दिशेने, असं म्हणत सूचक इशारा दिला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू असून ते परत येतील असा दावा केला होता. पण आता त्यांनी खळबळजनक ट्विट करुन मोठा ट्विस्ट आणला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. तर राऊतांच्या या ट्विट नंतर विधानसभा बरखास्त होणार की शिवसेना- भाजप मिळून सरकार स्थापन करणार हे दिवसभरातील घडामोडीनंतर स्पष्ट होईल.
हेही वाचा : राजकीय हालचालींना वेग, भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश
यापूर्वी युवासेना प्रमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँण्डलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे आता केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनामाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे.
महाविकास आघाडी सरकार हे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे आणि त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही तासात आजच राजीनामा देतील.