मुंबई / प्रतिनिधी
राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येते, जात असते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे! तुम्हीही नाही. असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिलेला आहे. एकंदरितच राज ठाकरे यांच्या पत्रावरून राज्यात राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे.
पत्रातील पुढील मजकूर असा, “धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आव्हान केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या. हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं कशासाठी? ध्वनी प्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे, मशीदी वरचे अनाधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी का? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
गेल्या आठवडाभरात महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार सरकार या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे. ते पाहता मला प्रश्न पडला की! मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रात्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत. जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत. अर्थात महाराष्ट्र सैनिकांविरोधात अत्याचारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कोणी दिलेत? हे समस्त मराठीजन तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहे. असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.