ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महात्मा गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली, असे वादग्रस्त वक्तव्य राजस्थानातील भाजप खासदार नरेंद्रकुमार खिचड यांनी एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांमधून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. जनतेच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर खिचड यांनी जनतेची माफी मागितली.
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील बाकरा गावात 25 जूनला स्वातंत्र्यसैनिक शेओलाल खिचड यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना खिचड म्हणाले, पंतप्रधान एकच होणार होता. यामुळे महात्मा गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणुकीसाठी पटवले आणि मारले. या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर खिचड यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला.
त्यानंतर खिचड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान व्हायला हवे होते. पण गांधींनी जवाहरलाल नेहरूंना पसंती दिली. गांधी यांच्यामुळेच सुभाषचंद्र बोस पंतप्रधान होऊ शकले नाहीत. गांधींनी सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या केली, असे मला म्हणायचे होते. पण माझ्या म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. मला गांधींबद्दल आदर आहे. त्यामुळे मी एखादा शब्द चुकीचा उच्चरला गेला असेल तर माफी मागतो.