ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे ‘महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अडचणीत वगैरे काही नाही. उलट आघाडीचा चौथा मेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल’, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली. आज शरद पवार Sharad Pawar) यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आमचा चौथा उमेदवार निवडून येणार यात शंका नाही. तर अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत आपल्याला माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी लोकांची नाराजी होत असते परंतु समाजवादी पक्ष हा भाजपविरोधी (BJP) उत्तरप्रदेशमध्ये राहिलेला आहे आणि त्यांचा मुलाधार तोच आहे त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील’, अशी खात्रीही जयंत पाटील यांनी दिली.
‘आज विधानसभेच्या सर्व सदस्यांना महाविकास आघाडीकडून सूचना दिल्या आहेत. कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. बहुसंख्य आमदार मुंबईत दाखल झाले आहेत त्या सर्वांसाठी ही बैठक होती असेही जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान विधानपरिषदेसाठी चर्चा सुरू असून दोन जागा आमच्या असून दोन जागांसाठी चर्चा सुरू आहे. त्याचा योग्यवेळी निर्णय जाहीर करु’, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि सेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांच्यात जोरदार लढत होणार आहे. दोन्ही पक्षाकडून विजयाचा दावा केला जात आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने दोन्हीकडून दगा फटका होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.