ऑनलाईन टीम/तरुण भारत
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीने (maha vikas aghadi) बाजी मारली. काँग्रेसच्या (congress) उमेदवार जयश्री जाधव (jayshree jadhav) यांनी भाजपाचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (satyjit kadam) यांचा पराभव केला. जयश्री जाधव १९ हजार ३०७ मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत जाधव यांना ९७,३३२ तर कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. या विजयामुळे जाधव या कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. दरम्यान या पराभवानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“तीन पक्ष एकत्र निवडणूक लढूनही मागील वेळी एका पक्षाला मिळाली होती तेवढीच मतं मिळाली आहेत. निवडणुकीत सहानुभूतीचा फॅक्टर चालेल याची आम्हाला कल्पना होती. आपण जर २० निवडणुका अशा काढल्या जिथे उमेदवाराचं निधन झालं आहे त्यांच्या घरचं कोणी उभं असेल आणि विशेषत: पत्नी तर त्या निवडून आल्या आहेत. ती आमची मानसिकता आहे. पण अशाही स्थितीत भाजपाला जी मतं मिळाली त्यातूम मी समाधानी आहे. २०२४ मध्ये ही जागा भाजपा १०० टक्के जिंकणार याची मला खात्री पटली आहे”, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.