प्रतिनिधी/सोलापूर
गणेश विसर्जनावेळी विहिरीतील पाण्यात बुडून महावितरणमधील कर्मचाऱयाचा मृत्यू झाला. विजय भीमाशंकर पनशेट्टी (वय 32, रा. हत्तुरे वस्ती, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे हत्तुरे वस्ती परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
होटगी रस्त्यावरील हत्तुरे वस्ती येथील हरिओम मंडळाची स्थापना विजय यांनी मित्रांसमवेत केली होती. यंदाच्या श्री उत्सवाचे अध्यक्षपदीही विजय यांच्याकडेच होते. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीत श्रींचे विसर्जन करण्याकरिता मंडळातील लोकांबरोबर विजय शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गेले होते. श्रींची मूर्ती घेऊन विजय हे विहिरीत उतरले. ते मूर्तीसोबत पाण्यात बुडाले. काहीवेळानंतर विजय पाण्यातून वर आल्याचे दिसले नसल्याने मंडळातील लोकांनी आणि तेथील उपस्थितांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या प्रयत्नाला यश आले नाही. दरम्यान पहाटेच्या सुमारास जीवरक्षक आणि पोलिसांच्या मदतीने विजय यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
मागील सुमारे दहा वर्षांपासून विजय हे महावितरणमध्ये तंत्रज्ञ म्हणून नोकरी करीत होते. शहरातील गुरुनानक चौकातील महावितरण कार्यालयात त्यांची नियुक्ती होती. पाच वर्षांपूर्वी विजय यांनी प्रेमविवाह केला होता. दरम्यान, कौटुंबिक वादातून त्यांच्या पत्नीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केल्याचे समजते. त्यांना चार वर्षांचा एक मुलगा आहे. आई-वडिलांच्या मदतीने मुलांचा सांभाळ ते करत होते. आईचे छत्र हरपलेल्या मुलाला आता वडिलांचेही छत्र राहिले नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.