नवी दिल्ली
मागील वर्षभरात मोठय़ा प्रमाणात मैदा 38-40 रुपये प्रति किलो आणि ब्रँडेड पॅकमध्ये 45-55 रुपये प्रति किलो दराने विक्री केला जात आहे. जानेवारी 2022 मधील किमतींपेक्षा दर 40 टक्के पेक्षा अधिक आहे. कमोडिटी विश्लेषकांच्या मते जर सरकारने गव्हाचा साठा खुल्या बाजारात सोडला नाही तर पिठाच्या किमती आणखी वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गव्हाच्या निर्यातीवर बंदी असतानाही जानेवारीत गव्हाच्या किमती 7-10 टक्क्यांनी वाढल्या. वास्तविक, देशात गेल्या काही काळापासून गव्हाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. चालू हंगामासाठी सरकारची किमान खरेदी किंमत (एमएसपी) 2,125 रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र मंगळवारी इंदूरमध्ये गव्हाचा दर प्रतिक्विंटल 31.00 रुपयांच्या विक्रमी पातळीवर राहिल्याची नोंद करण्यात आली.
दिल्लीत गहू 3,150 रुपयांना विकला गेला, तर देशातील अनेक भागांमध्ये तो 3,200 रुपयांवर विकला गेला. त्याचा परिणाम केवळ पिठावरच नाही, तर त्यापासून तयार होणाऱया सर्व पदार्थांच्या किमतीवर दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
एका महिन्यात 20 टक्क्यापर्यंत वाढ
गहू महाग असल्याने पीठ, मैदा, रवा यांच्या दरातही महिनाभरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारने खुल्या बाजारात गहू विकावा अशी अपेक्षा असलेल्या गिरणी मालकांनी आता चढय़ा भावाने गहू खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पीठ महाग होत आहे.
अतिरिक्त गहू, पुन्हा खुल्या बाजारात नाही विकला
ओरिगो कमोडिटीचे वरिष्ठ व्यवस्थापक इंद्रजित पॉल यांनी सांगितले की, ‘सरकारी गोदामांमध्ये सुमारे 115 लाख टन गहू आहे. सरकारने 15 दिवसांत खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत गहू बाजारात न विकल्यास पिठाच्या किमती 5 ते 6 टक्क्यांनी वाढू शकतात.’ असे पॉल यांनी स्पष्ट केले आहे.
एप्रिलपासून गव्हाचा नवीन साठा राहणार
आगामी काळात पुढील मार्च-एप्रिलमध्ये गव्हाचा नवीन साठा बाजारात उपलब्ध होईल, असे पॉल यांनी सांगितले. त्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, यादरम्यान सरकारने आपला साठा विकला तर किमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता बाजारात मांडली जात आहे.