स्वतंत्र पाणी योजनेचा प्रस्ताव: मात्र तात्पुरता उपाय काय? गावापुढे प्रश्न
हातकणंगले/ प्रतिनिधी
हातकणंगले,(कोल्हापूर) : मजले ( ता. हातकणंगले ) गावासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत ४.९१ कोटी रुपयांची स्वतंत्र पाणी योजना तांत्रिक मंजूरीसाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठविल्याने गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. योजनेला अंतिम मंजूरी मिळुन प्रत्यक्षात पाणी नळाला येई पर्यंत पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करायची व यासाठी निधी कोठून आणायचा असा प्रश्न ग्रामपंचायतीस भेडसावत आहे. यासाठी नेते मंडळींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन लोकनियुक्त सरपंच शिकंदर कोठावळे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
कोल्हापूर सांगली रस्त्यावर डोंगराच्या कुशीत असलेल्या या गावाने गाव पाणीदार करण्यासाठी अख्ख्या गावाने मोठी मेहनत घेतली. डोंगरावरचे पाणी तळ्यात यावे यासाठी गावाने श्रमदान केले. याची नोंद अनेक माध्यमांनी घेतली .मात्र सध्या याच गावापुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९८२/८३ साली केलेल्या चौदा गाव प्रादेशिक योजनेतून मजले गावास पाणी पुरवठा होत होता.मात्र योजना जानेवारी २०२१ मध्ये बंद पडली. ग्रामपंचायतीने स्वजल धारा योजने अंतर्गत पाणी योजना करण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा प्रस्तावही तयार केला. विहिर काढुन यातुन पाणी पुरवठा करायचा असा हा आराखडा होता. मात्र भुजल प्राधिकरणाने लोकांना पुरेल येवढा पाणी साठा जमिनित नसल्याचा आवाहल दिल्याने हि योजना होऊ शकली नाही.
गावकऱ्यांनी पाणीदार गाव करण्यासाठी श्रमदानातून पाणी आडवा पाणी जीरवा उपक्रम मोठ्या जोमाने राबविला. नाना पाटेकर , मकरंद अनासपूरे तसेच अनेक सामाजिक संस्थानी याचे तोंडभरून कौतुक केले. पाणी जमिनित मुरले मात्र गावची पाणी टंचाईची समस्या काही संपली नाही. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. गावातील खाजगी पाणी स्त्रोत स्वतः ताब्यात घेऊन लोकांना पाणी देण्या ऐवजी तहसिलदारांनी सरपंचानाच पाणी स्त्रोत ताब्यात घ्या असे सांगितले. यानंतर संजय घोडावत, माजी जिप सदस्य प्रसाद खोबरे, देवानंद कांबळे यानी टँकरने पाणी दिले.
दरम्यान जलजीवन योजनेतुन ४.९१ कोटी रुपयांच्या वारणा नदीवरून स्वतंत्र पाणी योजनेस जिल्हा परिषेदेने तत्वतः मंजूरी देऊन तांत्रिक मंजूरीसाठी शासनाकडे पाठविल्याचे नेत्यानी जाहिर केले. यासाठी खासदार धैर्यशिल माने, आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले,प्रसाद खोबरे, पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे योगदान आहे. कोणी एकाने श्रेय घेणे योग्य नाही.मात्र यावेळी उपसरपंच बाबासो पाटील, अविनाश पाटील, आशिष कोठावळे, भास्कर कोठावळे, जिनपाल कोठावळे, रोहित कोठावळे, विनोद कोठावळे, राजू साळुंखे, अशोक गडदे, आदि उपस्थित होते.
18 लाखाची गरज
हि योजना मंजूर होऊन पुर्णत्वास येईपर्यंत बराच कालावधी लागेल. दरम्यानच्या काळात लोकांना पाणी देण्यासाठी कोणती तरी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.यासाठी ग्रामपंचायतीने खणीतून पाणी उपसुन गावाला पाणी पुरविण्याचा आराखडा तयार केला आहे. मात्र यासाठी १८लाख रूपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी आमदार, खासदार,जि.प. सदस्य यांनी द्यावा असे सरपंच सिकंदर कोठावळे यांनी सांगितले.