प्रतिनिधी /बेळगाव
‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ असा स्नेहमय संदेश देत रविवारी शहर परिसरात मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. काही ठिकाणी भाकरी आणि इतर पदार्थांची देवाणघेवाण करण्यात आली.
नात्यातील गोडवा वाढविणाऱ्या मकरसंक्रांतीसाठी नागरिकांनी तिळगुळ वाटून शुभेच्छा दिल्या. सुवासिनींनी वाण देऊन सण साजरा केला. काही ठिकाणी हळदीकुंकूच्या प्रथेला सुरुवात झाली. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी तिळगुळ, बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीची खरेदी झाली. चटण्यांची रेलचेलही पाहायला मिळाली. शहराबरोबर ग्रामीण भागात तिळगुळ, भाकरी आणि इतर पदार्थांची देवाणघेवाण होत होती. संक्रांतीला काळे तीळ, भाकरी, चटण्या यांना महत्त्व दिले जाते. घरोघरी जाऊन बालचमूंनी तिळगुळ वाटून मकरसंक्रांत साजरी केली.