तरुण भारतच्या वृत्तानंतर अधिकाऱ्यांना जाग
राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी अभयारण्य क्षेत्रात असलेल्या माळेवाडी लघु प्रकल्पाच्या मुख्य भिंतीतून आणि गेटमधून डिसेंबर महिन्यात मोठ्याप्रमाणात गळती सुरू असल्याने यावर्षी हा प्रकल्प मार्चमध्येच कोरडा पडला होता. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या ओलवन, दाजीपूर, बौद्धवाडी, भटवाडी, शिवाचीवाडी या गावांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याची वास्तवदर्शी बातमी दै. तरुण भारतने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर, शाखा अधिकारी समिर निरुखे, स्थापत्य सहाय्य्क वीरेंद्र मंडलिक यांनी माळेवाडी पाठबंधारे लघु प्रकल्पास भेट दिली. पाहणीनंतर प्रकल्पाच्या मुख्य गेटचे रबर सील खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी यांत्रिक विभागाला माहिती देण्यात आली आहे.
इंटक वेलला काही ठिकाणी आतून भगदाड पडली आहेत. त्याची दुरुस्ती, गाळ काढणे आणि इतर तत्सम कामासाठी दहा लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. उन्हाळ्यापूर्वी प्राथमिक दुरुस्ती करून पाणी साठ्याचे अडथळे दूर करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.