काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यसभेत लंडनमध्ये कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, या भाजपने कलेल्या मागणीवर जोरदार वाद झाला. या गदारोळात बोलताना कॉंग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशहा प्रमाणे वागत असल्याचा दावा केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, “लोकशाहीला चिरडणारे, नष्ट करणारे लोकशाही वाचवण्याविषयी बोलत आहेत… पंतप्रधान मोदी हुकूमशहाप्रमाणे सरकार चालवताना भाजप लोकशाही, देशाचा अभिमान वाचवण्याची भाषा करत आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “कॉंग्रेस पक्ष अदानी कंपनीच्या स्टॉक्सच्या मुद्द्यावर जेपीसीच्या स्थापनेची मागणी करत आहे. जेव्हा आम्ही हा मुद्दा उपस्थित करतो तेव्हा माइक बंद केले जातात आणि सभागृहात गदारोळ माजवला जातो.” असा आरोपही त्यांनी केला.
मोदींनी परदेशी भूमीवर केलेल्या विधानाची आठवण करून देताना विरोधी पक्षनेते खरगे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करताना म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मला त्यांनी चीनमध्ये केलेल्या विधानाची आठवण करून द्यायची आहे. ते म्हणाले होते, ‘अगोदर तुम्हाला भारतीय जन्माची लाज वाटायची…आता तुम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो.’ हा भारताचा आणि भारतीयांचा अपमान नव्हता का? तुमच्या मंत्र्यांना आपापल्या आठवणी ताज्या करायला सांगा!” असा उपरोधात्मक टोला मारला आहे.