सर्वोच्च न्यायालयाकडून दोन हजार रुपये दंड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याला अवमान प्रकरणी चार महिन्यांचा तुरुंगवास आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास 2 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मल्ल्याला कोणताही पश्चाताप होत नसल्यामुळे शिक्षा अत्यावश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यु. यु. लळित, न्यायमूर्ती एस. रविंद्र भट्ट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. 9 हजार कोटींहून अधिक कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप मल्ल्यावर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या एका गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानुसार मल्ल्याविरुद्ध अवमानाचा आरोप सिद्ध झाला आहे.
अवमाननाप्रकरणी 9 मे 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला दोषी ठरवून त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू केली. त्यानंतर 2020 मध्ये मल्ल्याच्यावतीने दाखल करण्यात आलेली फेरविचार याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली होती. 10 मार्च रोजी मल्ल्याच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवण्यात आला होता. यासंबंधी सोमवारी निकाल देताना त्रिसदस्यीय खंडपीठाने विविध टिप्पण्या दिल्या. विजय मल्ल्याने परदेशी खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याबाबत न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचे म्हटले आहे. तसेच गेल्या 5 वर्षांपासून न्यायालयात हजर न राहून अवमानाचा काळ आणखी वाढवल्याचे मत खंडपीठाने निकाल सुनावताना व्यक्त केले.