राज्याला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत पश्चिम बंगालच्या वाट्यातील निधी केंद्राने थांबवल्याची तक्रार त्यांनी केली. मात्र, केंद्र आणि राज्यातील संबंधित अधिकारी एकत्र बसून योग्य निर्णय घेतील, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याचे समजते.
तृणमूल काँग्रेसच्या 10 नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. केंद्राकडे राज्याचे 1.16 लाख कोटी ऊपये येणे बाकी आहे. आम्हाला 100 दिवसांचा थकबाकीचा निधी दिला जात नाही. तसेच अनेक योजनांचा निधी थांबला आहे. गरिबांचे पैसे रोखणे योग्य नाही, असे आपण पंतप्रधानांना सांगितल्याचे ममतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी एकत्र बसून निर्णय घेतील असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन उपस्थित होते.
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबाबत ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आघाडीमध्येही पंतप्रधान पदासाठी चेहरा असायला हवा. त्यामुळेच आपण मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही त्याला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.