केंद्रीय योजनांसाठीचा निधी मिळत नसल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारपासून कोलकाता येथे दोन दिवसीय आंदोलन सुरू केले आहे. सुरुवातीला दिल्लीतील आंबेडकर मूर्तीसमोर त्यांचे धरणे आंदोलन होणार होते, मात्र नंतर त्यांनी कोलकात्यातच धरणे धरण्याचा निर्णय घेतला. योजनांसाठीचा निधी केंद्र सरकारकडून वेळेत मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारविरोधात धरणे धरले आहे. मोदी सरकार केंद्राच्या योजनांमध्ये निधी देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनरेगा आणि गृहनिर्माण योजनेसाठी राज्याला एक रुपयाही मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्याला केंद्रीय निधी प्राप्त होण्यासाठीच 29 आणि 30 मार्च रोजी केंद्र सरकारविरोधात त्या आंदोलन करत आहेत.
केंद्र सरकार सर्वसामान्यांचा पैसा रोखून धरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बंगालमधील लोकांच्या रोजगाराचा पैसा केंद्राला परत करावा लागेल, असे सांगतानाच गॅसच्या किमती वाढत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारकडून राज्याला सात हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. यापूर्वीची थकबाकीही सरकारने काढली नसल्याचे त्यांनी सांगितले. 55 लाख घरांच्या बांधकामासाठीच्या गृहनिर्माण योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. 12 हजार गावांमधील खराब रस्ते आम्ही दुरुस्त करत आहोत. हे सर्व आपण राज्यांतर्गत निधीतून करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.