काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचा हल्लाबोल ः विरोधी पक्षांमध्ये एकीपूर्वीच बेकी
वृत्तसंस्था / कोलकाता
काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. मोदी आणि ममता बॅनर्जी हे दोन्ही नेते एकाच विचारसरणीचे आहेत. ममतादीदी आणि मोदी यंच्यात एक अंडरस्टँडिंग आहे. पंतप्रधान मोदी नाराज होतील असे ममतादीदी काहीच करू शकत नाहीत. भारत ‘काँग्रेसमुक्त‘ करू असे मोदींनी म्हटल्यावर ममतादीदी बंगालमधून काँग्रेस हटविण्यात यावी असे म्हणू लागतात. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे अनेक राजकीय पक्ष कौतुक करत आहेत, परंतु ममतादीदींनी यासंबंधी अवाक्षरही काढले नसल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात तडजोड झाली आहे. अमित शाह आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अलिकडेच झालेल्या बैठकीचा उल्लेख चौधरींनी केला आहे. पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात तडजोड घडवून आणण्यासाठी राज्याचा दौरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱयानंतर बॅनर्जी यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाचा वेग मंदावला असल्याचा दावा चौधरींनी केला.
तृणमूलचा काँग्रेसवर आरोप
2024 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस एकला चलो रे च्या मार्गावर आहे. तृणूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांदरम्यान एक समन्वय टीम आणि अन्य राज्यांमध्ये एक संयुक्त कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. परंतु काँग्रेसनेला याला कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही असा आरोप तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केला आहे. विशेषकरून भाजपशासित राज्यांमध्ये विरोधी पक्षांची संयुक्त सभा आयोजित करण्याचा प्रस्ताव ममतादींदीनी मांडला असल्याचे घोष यांनी सांगितले आहे.
हाथ जे हाथ जोडो अभियान
तर काँग्रेस पक्ष स्वतःच्या भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे उत्साहात आहे. या यात्रेने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून राहुल गांधी यांची प्रतिमा गंभीर राजकीय नेत्याची झाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. पक्ष आता लोकसभा निवडणुकीत या यात्रेमुळे झालेल्या वातावरणनिर्मितीचा लाभ उचलू पाहत आहे. अशा स्थितीत काँग्रेसने भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा हाथ से हाथ जोडो अभियानाची घोषणा केली आहे. तसेच याचा लोगोही सादर केला आहे.