4 मंत्र्यांचे कामकाज सांभाळणे अशक्य ः 4-5 नवे चेहरे सामील होणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी स्वतःच्या मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. अनेक मंत्रिपदे रिक्त असून सर्व विभागांचे कामकाज स्वतः करू शकत नाही. याचमुळे 4-5 नवे चेहरे मंत्रिमंडळात सामील होणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सोमवारी एका बैठकीनंतर सांगितले आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी 7 नव्या जिल्हय़ांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यात आता 30 जिल्हे असणार आहेत. मुख्यमंत्री ममता यांनी राणाघाट, बहरमपूर, कांदी, बशीरहाट, सुंदरवन, विष्णुपूर, इच्छामती या 7 नव्या जिल्हय़ांची घोषणा केली आहे. ममतांनी मागील 4 दिवसांमध्ये दुसऱयांदा मंत्रिमंडळ बैठक घेतली आहे. यापूर्वी 28 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ममतांनी शिक्षक भरती घोटाळय़ातील आरोपी पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपदावरून हटविण्याची घोषणा केली होती.
साधन-सुब्रत यांचे निधन
ममता मंत्रिमंडळात महत्त्वाच्या 5 मंत्रिपदांपैकी 4 पदे रिक्त आहेत. मंत्रिमंडळात सर्वात वरिष्ठ मंत्री राहिलेले सुब्रत मुखर्जी आणि साधन पांडे यांचे चालू वर्षी निधन झाले आहे. तर पार्थ चॅटर्जी हे तुरुंगात असल्याने त्यांना मंत्रिपद गमवावे लागले आहे. तर अर्थमंत्री राहिलेले अमित मित्रा यांनी मंत्रिपद सोडत सल्लागारपद स्वीकारले आहे.
एक व्यक्ती-एक पद
मंत्रिमंडळ फेरबदलात ‘एक व्यक्ती-एक पद’ हे सू लागू होऊ शकते. सध्या परिवहन मंत्री फिरहाद हकीम समवेत काही मंत्र्यांकडे दोन किंवा त्याहून अधिक विभागांची जबाबदारी आहे. अशास्थितीत त्यांना काही विभाग गमवावे लागू शकतात. फेब्रुवारी महिन्यात तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या समर्थकांनी ‘एक व्यक्ती-एक पद’ सूत्र लागू करण्याची मागणी केली होती, याप्रकरणी पक्षांतर्गत मोठा वादही झाला होता.
बाबूल सुप्रियोंना संधी शक्य
मंत्रिपदाच्या शर्यतीत भाजपला रामराम ठोकत तृणमूलमध्ये दाखल झालेले बाबुल सुप्रियो, निर्मल माझी यांचा समावेश आहे. याचबरोबर पक्षाच्या काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. तर काही मंत्र्यांना अधिक महत्त्वाचे खाते मिळू शकते. तृणमूल काँग्रेसने आता 2023 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.