गोकुळ शिरगाव/प्रतिनिधी
मंडलिक आणि मानेंना पश्चाताप करावा लागेल- आमदार वैभव नाईक
कोल्हापूर जिल्हा हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अतिशय विश्वासाने संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व धैर्यशील माने (Dhairyashil Mane) या दोन खासदारांना तिकीट देऊन त्यांच्या प्रचाराला सातत्याने हजेरी लावून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांनी आज शिंदे गटाबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय मात्र त्यांनी अतिशय चुकीचा असल्याचे मत कणकवलीचे आमदार आमदार वैभव नाईक (Vaibhav Nike) यांनी तरुण भारत शी बोलताना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. ते कोल्हापूर येथील गोकुळ शिरगाव औद्योग वसाहतीमध्येमध्ये आपल्या खाजगी कामानिमित्त आले होते.
हे ही वाचा : आमदार खाडेंच्या विकासकामांची चौकशी लावणार- बाळासाहेब होनमोरे
पुढे बोलताना ते म्हणाले, कोल्हापूरच्या या दोन्ही खासदारांना यापूर्वी विधानसभेची व लोकसभेची कोणीही उमेदवारी दिली नसताना प्रथमच या खासदारांना शिवसेनेने उमेदवारी देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जीवाचे रान करून यांना निवडून आणले. पण आज शिवसेना पक्ष अडचणीत असताना या खासदारांनी घेतलेले निर्णय हे सर्वांसाठी वेदनादायी आहेत. यापूर्वी सुद्धा शिवसेनेवर अशी बरीच संकट आली पण शिवसेना पक्ष हा पुन्हा नेटाने उभा राहिला, त्याचबरोबर या अगोदर शिवसेना सोडून गेलेल्या खासदार व आमदारांची सध्याची परिस्थिती सुद्धा आपण पाहत आहोत. भविष्यात भाजप सुद्धा यांना जवळ करेल की नाही याची सुद्धा शंका येते. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपने खास करून आमदार चंद्रकांत दादांनी या ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभा केले होते, त्यामुळे भाजप आपल्या पद्धतीने आपली चाल चालत आहे. हे शिवसेनेच्या नेत्यांनी खासदारांनी ओळखायला पाहिजे होते. पण त्यांनी का असा निर्णय घेतला हे त्यांचे त्यांनाच माहीत. या निर्णयाने त्यांचे भविष्यात फार मोठे राजकीय नुकसान होईल असे ते यावेळी म्हणाले. लवकरच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिवसैनिकांना बळ देण्यासाठी राज्यभर दौरा करणार आहेत. लवकरच ते कोल्हापूरला सुद्धा शिवसैनिकांना भेट देण्यासाठी येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.