माजी मंत्रिमंडळ सचिव के. एम. चंद्रशेखर यांचा गौप्यस्फोट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या दहा दहशतवाद्यांनी भारतात घुसून मुंबईवर केलेल्या हल्ल्यामुळे त्यावेळचे मनमोहनसिंग सरकार भयभीत झाले होते, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव के. एम. चंद्रशेखर यांनी केला आहे. त्यावेळी केंद सरकारची अगतिकता एवढी होती की त्यांना नेमके काय करायचे हेदेखील सुचत नव्हते. अंधारात चाचपडल्याप्रमाणे सरकारची अवस्था झाली होती. निर्णय न घेण्याची त्या सरकारची सवय या हल्ल्यामुळे उघडी पडली होती, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
चंद्रशेखर यांनी नुकतेच ‘ऍज गुड ऍज माय वर्डस्’ नामक पुस्तक लिहिले आहे. त्यात मुंबई हल्ल्यानंतर केंद्र सरकारची अवस्था कशी दयनीय झाली होती, याचे वर्णन आहे. या हल्ल्यानंतर सरकारची स्थिती भ्रमित झाली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही सैरभैर झालेले होते. त्यांना सरकारला कोणते मार्गदर्शन करायचे हे देखील सुचत नव्हते, असे चंद्रशेखर यांनी पुस्तकात स्पष्ट केले आहे.
पद निर्माण केले, पण…
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पद निर्माण करण्याचा त्या सरकारचा निर्णय योग्य होता. मात्र, या पदावरील व्यक्तीला आवश्यक ते स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करण्यात आली नव्हती. परिणामी, या पदावरील व्यक्तीचाही मुंबई हल्ल्याच्या काळातील परिस्थितीत उपयोग होणार नव्हता. साऱया सरकारमध्येच एक भयाण पोकळी निर्माण झाली होती. कोणीही नेमका निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हते. सुरक्षा सल्लागार आणि मंत्रिमंडळ सचिव यांचे अधिकार आणि कर्तव्ये यांचे वाटप करण्यात आले होते पण त्यामुळे अधिकच भ्रम निर्माण झाला होता. सुरक्षा सल्लागाराने नेमके काय करायचे आणि मंत्रिमंडळ सचिवाने नेमके काय करायचे हेच स्पष्ट नव्हते. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला, असे त्यांनी म्हटले आहे.
कोणी काय करायचे यासंबंधी संभ्रम
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा केंद्र सरकारमधील कोणी काय करायचे यासंबंधी प्रचंड संभ्रम होता. कायदा आणि सुव्यवस्था हा घटनेनुसार राज्याचा विषय आहे. त्यामुळे हा हल्ला महाराष्ट्र सरकारने हाताळायचा की, केंद्राने हस्तक्षेप करायचा हेच कोणाला कळत नव्हते. मी त्यावेळी मंत्रिमंडळ सचिव होतो. मला तो हल्ला लवकरात लवकर संपवायचा होता. पण माझ्याकडे कोणतीही गुप्त माहिती नव्हती, की, स्रोत नव्हते. त्यामुळे माझीही स्थिती अगतिक होती, अशी स्पष्टोक्ती करताना चंद्रशेखर यांनी ते एक दुःस्वप्न असल्याची खंत व्यक्त केली आहे.