माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आता सक्रीय राजकारणाचा त्याग केला आहे. तथापि, देशाची दिशाभूल करण्याची सवय त्यांनी सोडलेली नाही, असा खोचक टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळविली, असा आरोप सिंग यांनी पत्राद्वारे केला होता.
मनमोहनसिंग यांनी हे पत्र पंजाबमधील मतदारांसाठी प्रसिद्ध पेले होते. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक आरोप केले होते. देशाची प्रतिष्ठा खालावणारा असा नेता आपण कधी पाहिला नाही, अशी टिप्पणीही त्यांनी पत्रात केली होती. भारतीय जनता पक्षाने आरोप फेटाळले आहेत. मनमोहनसिंग यांनी नैराश्याच्या भावनेतून अशा टिप्पण्या केल्या आहेत. ज्या व्यक्तीने देशाचे नेतेपद भूषविले आहे, अशा व्यक्तीने अशा प्रकारे आरोप करणे हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, असे प्रतिपादन प्रवक्ते आर. पी. सिंग यांनी केले.