लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय शिष्टाचार पाळण्याचा पंतप्रधानांचा मनोदय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या 110 व्या भागात महिला शक्तीच्या योगदानाला सलाम केला. महिलांना समान संधी मिळाल्यावरच जग समृद्ध होईल, असे महाकवी भारतीयारजींनी म्हटल्याचा संदर्भही पंतप्रधानांनी यावेळी दिला. तसेच नजिकच्या काळात होणाऱ्या देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय शिष्टाचारामुळे पुढील तीन महिने आपण ‘मन की बात’ कार्यक्रम करू शकणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या 110 व्या भागाद्वारे लोकांना संबोधित केले. यादरम्यान पंतप्रधानांनी तीन लोकांशी फोनवर संवाद साधला आणि विविध सरकारी योजनांबाबत आपले अनुभव जाणून घेतले. नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी आपल्या मातृभूमीला रसायनांमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यात मातृसंस्थेचे मोठे योगदान आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील महिलांनी आता नैसर्गिक शेतीचा विस्तार केला पाहिजे, असे आवाहनही केले.
देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून गेल्यावेळेप्रमाणेच मार्च महिन्यातच आचारसंहिता लागू होण्याची शक्मयता आहे. आतापर्यंत ‘मन की बात’चे 110 भाग पूर्ण झाले असून देशाच्या सामूहिक शक्तीची आणि कर्तृत्वाची चर्चा झाली आहे. एकप्रकारे हा लोकांनी, लोकांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र तरीही राजकीय शिष्टाईचे पालन करून लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘मन की बात’ पुढील 3 महिने प्रसारित होणार नाही. आता जेव्हा आम्ही तुमच्याशी ‘मन की बात’ मध्ये संवाद साधू, तेव्हा तो 111 वा भाग असेल. पुढच्या वेळी ‘मन की बात’ 111 या शुभ अंकाने सुरू होणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.
निवडणुकांबाबत आवाहन
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातील नवमतदार आणि विशेषत: महिलांना आपला मताधिकार योग्यपणे बजावण्याचे आवाहन केले. मतदान करणे हा लोकशाहीने दिलेला मोठा हक्क असून तो नम्रपणे बजावण्याचा संदेश मोदींना देशवासियांना दिला.
बिहारच्या मुसहर जातीचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमध्ये मुसहर जातीचा उल्लेख केला. बिहारमध्ये ही जात नेहमीच उपेक्षित म्हणून पाहिली जाते. सर्वात मोठे कारण म्हणजे या जातीचे मागासलेपण आणि दुर्दशा. यामुळेच बिहारमध्ये मुसहर समाजाला अजूनही योग्य ती मान्यता मिळालेली नाही. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी प्रशंसनीय कार्य करणाऱ्या भोजपूर जिह्यातील आराह येथील ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेवक भीमसिंह भावेश यांचे नावही घेतले.