ऑनलाईन टीम / मुंबई :
ॲटिलियासमोरील स्फोटकांच्या प्रकरणानंतर हत्या करण्यात आलेल्या मनसुख हिरेन (mansukh hiren) यांच्या कुटुंबियांची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज भेट घेतली. मनसुख हिरेन यांचं कुटुंब आता थोड स्थिरावलं आहे. त्यांच्या मी चर्चा केली, ते आता ठीक आहेत. उद्धव ठाकरेंच्या माफिया पोलिसांनीच त्यांची हत्या केली. त्यानंतर हिरेन वसुलीखोर असल्याचे चित्र ठाकरे सरकारने तयार केले होते. त्यामुळे हिरेन कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला होता. दरम्यान, वाझेंना आणि प्रदीप शर्मा यांना पुन्हा पोलीस दलात आणणाऱ्यांची चौकशी केली पाहिजे, असे किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी म्हटले आहे.
सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी दोन माफियांना पोलीस दलात बैकायदेशीर पद्धतीनं नियुक्त केलं. तसेच, या दोघांना त्यांच्या सरकारने 100 कोटींचं टार्गेट दिलं. त्यामुळे हे दोघेजण निर्दोष लोकांच्या सुपाऱ्या घेतात. आज हिरेन या कुटुंबाला अनाथ आणि निराधार करण्याचं पाप उद्धव ठाकरे सरकारनं केलं आहे. पुढच्या आठवडय़ात मी एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेणार असून आता एकच चार्जशीट दाखल झाली आहे, यापुढे अजून होऊ शकतात. हिरेन प्रकरणात कोणकोणते अधिकारी होते ते मी उघड करणार आहे. असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
दरम्यान, नवनीत आणि रवी राणा यांना तुरूंगात टाकण्याची सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का? नगराळे यांची बदली का केली गेली?, असाही प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला. तसेच संजय राऊत म्हणजे, विषय बदलण्यासाठी लावलेला उद्धव ठाकरेंचा भोंगा आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.