गुजरातमध्ये मोहिमेचा शुभारंभ : संयुक्त राष्ट्र महासचिवांची उपस्थिती : 1 कोटी लोकांना जोडणार
अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरात दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केवडियामध्ये ‘मिशन लाईफ’ योजनेचा शुभारंभ केला. याप्रसंगी हवामान बदलासाठी भारत कशाप्रकारे काम करत आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच पर्यावरण रक्षणासह जीवन जगण्याचा नवा मंत्रही दिला. आपल्या जीवनशैलीत छोटे-छोटे बदल करून आपण पर्यावरणाचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘मिशन लाईफ’ आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रेरणा देते आणि आजच्या काळात भारत प्रगतीचे आणि निसर्गाचे देखील एक उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींनी केवडियामध्ये ‘मिशन लाईफ’ या जागतिक मोहिमेची सुरुवात केली. ही पर्यावरण संरक्षणाची एक मोठी मोहीम असून त्यामध्ये सुमारे 1 कोटींहून अधिक लोकांचा सहभाग असल्याचा अंदाज आहे. या अभियानांतर्गत जगभरातील 118 देशांमध्ये त्याची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तसेच समकालीन भू-राजकीय आणि भौगोलिक-आर्थिक वातावरण, कनेक्टिव्हिटी आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या प्राधान्यांवर चर्चा केली जाईल. या अभियानांतर्गत हवामान बदल, पर्यावरण संरक्षण हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘मिशन लाईफ’ने जगभरातून नवीन सुरुवात करण्याचे आवाहन केले. यामध्ये पर्यावरण वाचवण्याची प्रतिज्ञा घेण्यासोबतच संवर्धनासाठी काम करण्याची प्रेरणा दिली जाणार आहे. तसेच पर्यावरणाला फायदा होईल अशा प्रत्येक छोटय़ा-छोटय़ा गोष्टींबाबतही जागरूकता निर्माण केली जाईल.
संयुक्त राष्ट्राची भारताला साथ : गुटेरेस
विकसित देशांनी भारतासारख्या देशांना आर्थिक आणि तांत्रिक मदत दिली पाहिजे. आपल्याला अक्षय क्रांती घडवून आणण्याची गरज आहे आणि संयुक्त राष्ट्र यासाठी भारतासोबत काम करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले. ‘मिशन लाईफ’च्या जागतिक प्रक्षेपणप्रसंगी संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस देखील उपस्थित होते. याशिवाय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही उपस्थित होते.
छोटय़ा बदलांमधून मोठे फायदे : मोदी
आपल्या जीवनशैलीत छोटे-छोटे बदल करून आपण पर्यावरणाचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हवामान बदलाचा मुद्दा सर्वत्र दिसत आहे. हिमनद्या वितळत आहेत, तर काही नद्या कोरडय़ा पडत असल्याचीही स्थिती आहे. अशा अवघड स्थितीमध्ये ‘मिशन लाईफ’ हवामान संकटाशी लढण्यासाठी मदत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही लोकांना एसीचे तापमान 17 अंशांपर्यंत खाली आणणे आवडते, परंतु त्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले. हवामान बदलाच्या विरोधात एकता हा जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे. गुजरात हे भारतातील राज्यांपैकी एक आहे ज्याने पहिल्यांदा अक्षय ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षणासाठी काम करण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी नमूद केले.