भाजप खासदारांचे प्रमाण अधिक ः महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेला गैरहजर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विधेयक सादर करण्यापूर्वी त्यावर सखोल विचारविनिमय करण्यासाठी त्यांना संबंधित समितीला सोपविण्यात यावे अशी मागणी संसदेच्या जवळपास प्रत्येक अधिवेशनांमध्ये सर्व राजकीय पक्षांकडून केली जात असते. परंतु सप्टेंबर महिन्यात या पुनर्रचनेनंतर या समित्यांच्या बैठकांमध्ये सदस्यांची आकडेवारी पाहिल्यास त्यांची उदासीनता दिसून येते. या समित्यांच्या बैठकांमध्ये सत्तारुढ भाजपचे खासदारच सर्वाधिक गैरहजर राहिले आहेत.
कनिष्ठ सभागृहाच्या 13 स्थायी समित्यांच्या पुनर्रचनेनंतर 2022-23 दरम्यान विचारार्थ असलेल्या विषयांच्या निवडीसाठी ऑक्टोबरपासून 10 नोव्हेंबरपर्यंत 22 बैठका झाल्या, ज्यात सरासरी 16.18 टक्के सदस्यच उपस्थित राहिले. या समित्यांच्या बैठकांमध्ये अनुपस्थित राहणाऱया सदस्यांमध्ये जया बच्चन (सप), हेमा मालिनी, मनेका गांधी, प्रज्ञासिंह ठाकूर, राजीव प्रताप रुडी, प्रवेश वर्मा, किरीट प्रेमजीभाई सोलंकी (भाजप), इलैया राजा (नामनिर्देशित), हरभजन सिंह तसेच संजय सिंह (आप), सिमरनजीत सिंह मान (अकाली दल, अमृतसर), माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी, पी. चिदंबरम, मनीष तिवारी, दीपेंद्र हुड्डा (काँग्रेस) यांचा समावेश आहे.
अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी तसेच कल्याण बॅनर्जी अपक्ष कपिल सिब्बल तसेच नवनीत राणा, राजदच्या मीसा भारती देखील या समित्यांच्या बैठकांना गैरहजर राहिल्या आहेत. लोकसभेशी निगडित कृषी, खाद्य तसेच ग्राहक विषयक, विदेश, वाणिज्य, आवास तसेच शहरविकास, सामाजिक न्याय तसेच अधिकार मंत्रालयासह 12 हून अधिक स्थायी समित्यांच्या बैठकांमध्ये सरासरी 40 टक्क्यांपेक्षा अधिक सदस्य अनुपस्थित राहिले आहेत.
समितीच्या बैठकांमध्ये सर्वाधिक गैरहजर सदस्य सत्तारुढ भाजपचे आहेत. संसदेच्या स्थायी समितीत लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण 31 सदस्य असतात, यातील लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 10 सदस्य असतात. कृषी, पशूपालन आणि अन्नप्रक्रिया मंत्रालयाशी निगडित 31 सदस्यीय स्थायी समितीच्या बैठकीला केवळ 12 सदस्य उपस्थित राहिले. बैठकीत भाजपचे 7 आणि काँग्रेसचे 3 सदस्य अनुपस्थित राहिले.
डॉ. मनमोहन सिंहही अनुपस्थित
अर्थ मंत्रालयाशी निगडित स्थायी समितीची 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत समितीच्या 31 सदस्यांपंकी केवळ 17 सदस्यच उपस्थित होते. या बैठकीत अनुपस्थित राहणाऱयांमध्ये भाजपचे 5, काँग्रेसचे 4 तसेच बीजू जनता दल, टीआरएस, अकाली दल, शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य सामील आहे. बैठकीला गैरहजर राहणाऱया प्रमुख सदस्यांमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेसचे पी. चिदंबरम, गौरव गोगोई, मनीष तिवारी, भाजपचे प्रवेश वर्मा, बीजेडीचे पिनाकी मिश्रा यांचा समावेश आहे.