कागदपत्रांवरुन कारस्थान उघड, कठोर कारवाईची मागणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उघड आणि गुप्त पद्धतीने काम करणाऱया संघटनांच्या माध्यमातून देशाच्या शहरी भागांमध्ये आपला प्रभाव प्रस्थापित करा, असा आदेश माओवादी संघटनांकडून त्यांच्या हस्तकांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती उघड झाली असून, दिल्ली सीमेवर जवळपास वर्षभर चाललेले शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेच्या विरोधातील आंदोलनांमध्ये माओवाद्यांनी ‘घुसखोरी’ केली होती, असेही या कागदपत्रांमधून स्पष्ट होत असल्याने कठोर कारवाई केली जाणार आहे.
देशातील माओवाद्यांचे नेतृत्व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) कडे असल्याचा दावा केला जातो. या पक्षाची स्थापना 18 वर्षांपूर्वी झाली होती. त्यामुळे 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत पक्षाचा 18 वा स्थापना दिवस साजरा करण्याचा आदेशही पक्षाने आपल्या ग्रामीण आणि शहरी कार्यकर्त्यांना दिला आहे.
अराजक माजविण्याचे कारस्थान
देशात माओवादी अराजक माजविण्याचे कारस्थान करीत आहेत, असा आरोप केला जात आहे. या आरोपाला बळ मिळेल अशीच कागदपत्रे ते प्रसिद्ध करीत आहेत, असे तज्ञांचे म्हणणे आहे. नुकतेच या पक्षाने 21 पानांची एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. ‘ए मेसेज फ्रॉम द सेंट्रल कमिटी ऑफ दी सीपीआय (माओईस्ट) या नावाने ही पुस्तिका काढण्यात आली आहे. या पुस्तेकेद्वारे, कार्यकर्ते, समर्थक, सहानुभूतीदार, सहकार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांना पक्षाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार वागण्याचे आणि सामाजिक आंदोलनांमध्ये घुसखोरी करून त्यांचे नेतृत्व हाती घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘युनायटेड ऍक्शन फोरम’ या मंचाद्वारे आतापर्यंत इतरांनी चालविलेल्या अनेक आंदोलनांमध्ये माओवाद्यांनी घुसखोरी आणि शिरकाव केल्याचे या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. माओवाद्यांमुळेच शेतकरी आंदोलन यशस्वी ठरले आणि केंद्र सरकारला शेतकऱयांसाठी केलेले नवे कायदे मागे घ्यावे लागले, असे प्रतिपादन करत या पुस्तिकेत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आली असल्याचे दिसून येते.
लोकांमध्ये प्रक्षोभ होऊ द्या
व्यववस्थेविरोधात लोकांना भडकविण्याचे काम केले पाहिजे, असेही या पुस्तिकेत सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. कोठेही व्यवस्थेविरोधात आंदोलन सुरु असेल तर त्या आंदोलनाला मार्गदर्शन करणे, आंदोलकांमध्ये प्रक्षोभ उसळविणे आणि या आंदोलनाध्ये शिरकाव करुन त्याला ताबा मिळविणे हे माओवाद्यांचे ध्येय आणि धोरण असले पाहिजे, असेही प्रतिपादन या पुस्तिकेत करण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्राला विश्वस्त संस्था मिळणार