खानापूर तालुका म. ए. समितीचे तालुका आरोग्याधिकारी संजय नांद्रे यांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने शासकीय कार्यालयांवर मराठी फलक लावण्यात यावे, यासाठी तालुका आरोग्य अधिकारी संजय नांद्रे तसेच तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदन देवून मराठी फलक लावण्याची मागणी केली.
तालुक्यात 75 टक्के मराठी भाषिक आहेत. असे असताना शासकीय कार्यालयावर असलेले मराठी फलक काढून फक्त कन्नड फलक लावण्यात आले आहेत. भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निर्देशानुसार 15 टक्के भाषिक असलेल्या भागात त्या भाषेत व्यवहार करण्यात यावेत, तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मराठीत कागदपत्रे व व्यवहार करण्यात यावेत, असा निकालही देण्यात आलेला आहे. मात्र कर्नाटक सरकार दडपशाहीचे धोरण अवलंबत असून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळत आहे. तसेच मराठी भाषा, मराठी संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मंगळवारी तालुका आरोग्य अधिकाऱयांना भेटून इस्पितळावर मराठी फलक लावण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी तेथे उपस्थित असलेले डॉ. कदम यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
यानंतर शिष्टमंडळाने प्रवीण जैन यांची भेट घेतली. तहसीलदार कार्यालयावर असलेला मराठी फलक का मिटविण्यात आला. या ठिकाणी पुन्हा मराठी फलक लावण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रवीण जैन यांना देण्यात आले. यावेळी निवेदन स्वीकारून प्रवीण जैन म्हणाले, कन्नड फलक लावण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. त्यामुळे मी आपणास कोणतेही आश्वासन देणार नाही. आपण जिल्हाधिकाऱयांशी भेटून याबाबत मागणी करावी, जर जिल्हाधिकाऱयांनी मराठी फलक लावण्याचे आदेश दिल्यास मी निश्चित मराठी फलक लावेन, असे स्पष्ट केले.
या शिष्टमंडळात माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, शिवाजी पाटील, यशवंत बिरजे, आबासाहेब दळवी, नारायण कापोलकर, अमृत पाटील, शंकर गावडा, शामराव पाटील, मऱयाप्पा पाटील, डॉ. एल. एच. पाटील, रमेश देसाई यासह इतर कार्यकर्ते सहभागी होते.